Header Ad

'आणखी एक घोटाळा', सुचेता दलाल यांचे ट्विट आणि शेअर बाजारात घसरण



मुंबई - 1992 मध्ये हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांच्या एका ट्विटमुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी सुचेता दलाल यांनी आणखी एक घोटाळा झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सुचेता दलाल यांनी काय घोटाळा झाला याबाबत स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. मात्र अदानी समुहामध्ये गुंतवणूक केलेल्या तीन FPI ची खाती गोठवल्यानं त्यांचे शेअर्स कोसळले आहेत. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला आहे.

सुचेता यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, आणखी एक घोटाळा असा आहे जो उघडकीस येणं कठीण आहे. सेबीकडील ट्रॅकिंग यंत्रणेकडं असलेल्या माहितीच्या बाहेर हे सर्व आहे. एका समुहामध्ये मोठा फेरफार सुरु आहे. यासाठी परदेशी कंपन्यांना हाताशी धरलं आहे.हेच त्यांचं वैशिष्ट्य असून अजुनही काहीच बदललेलं नाही.

शेअर मार्केट सुरु होताच घसरण झाल्याचं बघायला मिळालं. सेन्सेक्स 230 अंशांनी घसरले. यामध्ये मोठा फटका बसला तो अदानी समुहाला. त्यांच्या 6 पैकी 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास 5 ते 20 टक्क्यांची घसरण झाली. यामध्ये अदानी एंटरप्रायजेसचे शेअर्स 15 टक्के, अदानी पोर्ट्स अँड इकॉनॉमिक झोन 14 टक्के, अदानी पॉवर 5 टक्के, अदानी ट्रान्समिशन 5 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 5 टक्के तर अदानी टोटल गॅस 5 टक्क्यांनी घसरला आहे. एनएसडीएलने Albula, Cresta आणि APMS यांची खाती गोठवल्यानं हा परिणाम झाला आहे. या तीन कंपन्यांची मिळून जवळपास 43 हजार कोटींची अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक आहे.
दरम्यान, ट्विटमध्ये सुचेता दलाल यांनी कोणत्याही ग्रुपचं नाव घेतलं नव्हतं. त्यांनी काही हिंट दिल्या होत्या. त्यामध्ये गुंतवणूकदार कशापद्धतीने ठराविक ग्रुपमध्ये गुंतवणूक करतात हे सांगितलं होतं. ही पद्धत, घोटाळा सिद्ध करणं हे कठीण असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. तसंच अनेकांनी सुचेता दलाल यांचे ट्विट हे एक पब्लिसिटी स्टंट असल्याचंही म्हटलं. त्यांच्या Absolute Power या नव्या पुस्तकाच्या आधी चर्चेत राहण्यासाठी असं केल्याचं म्हटलं गेलं. शेअर बाजारात या गोष्टी नव्या नाहीत असंही काहींनी म्हटलं आहे.

Powered by Blogger.